Monday, November 15, 2010

आपण तयार आहोत?

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे संसदेतील भाषण हा त्यांच्या भारत दौऱ्यातील परमोच्च बिंदू ठरावा. ओबामा उत्कृष्ट वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेतच. या दौऱ्यात त्याची वारंवार प्रचिती आली. हॉटेल ताजमध्ये 26/11 च्या हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहताना, हॉटेल ट्रायडन्टमध्ये भारतीय उद्योजकांशी संवाद साधताना आणि सेंट झेवियर्समध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ओबामा यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर उपस्थितांना जिंकून घेतले. संसदेत ते त्यावर कळस चढवतील अशी अपेक्षा होती आणि ती पूर्णही झाली. भारताच्या सर्वोच्च नेतृत्वासमोरील भाषण हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक ठरावे.
संसदेत बोलताना ओबामांनी वारंवार भारत-अमेरिका मैत्री पर्वाची चर्चा केली. 21 वे शतक दोन्ही देशांच्या सहकार्याचे असेल आणि एकमेकांच्या मदतीने दोघेही जगासमोरील आव्हानांचा सामना करतील असा आशावाद त्यांच्या भाषणातून डोकावत राहिला. उद्याच्या जगाच्या जडणघडणीत भारताची महत्त्वाची भूमिका आहे, असे सांगतानाच सध्या भारत त्याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याबद्दल अस्पष्टशी नारीजीही व्यक्त केली. कठीण परिस्थितीत भारताने लोकशाहीचे रक्षण केले आहे. इतर देशांमध्येही लोकशाहीचे रक्षण व्हावे, मानवाधिकाराची पायमल्ली होऊ नये यासाठी भारताने जातीने लक्ष घालावे अशी ओबामांची अपेक्षा आहे. भारत आता उगवती महासत्ता राहिलेला नसून, महासत्ता म्हणून भारताचा उदय याआधीच झाला आहे, असे त्यांनी या दौऱ्यात जवळपास प्रत्येक भाषणात सांगितले.
ओबामांच्या या भावना अगदी खऱ्या आहेत आणि त्यांचा हेतू प्रामाणिक आहे असे गृहीत धरले तरी काही प्रश्न उपस्थित होतात. सर्वात प्रथम ओबामा म्हणतात त्याप्रमाणे भारत खरेच महासत्ता झाला आहे का हे पडताळून पहावेच लागेल. भारताचा एक वर्ग श्रीमंत आणि विकसित गटात मोडतो, पण त्याहून खूप मोठा वर्ग रोजच्या जगण्यासाठी धडपडतो आहे. मुळात भारताची लोकसंख्या प्रंचड असल्यामुळे येथील श्रीमंत आणि मध्यम-उच्चमध्यम वर्ग यांची संख्याच अनेक देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. थोडक्यात अमेरिकेला अपेक्षित असलेली ही बाजारपेठ म्हणजे एक वेगळे राष्ट्र आहे असे म्हणता येईल. पण उरलेल्यांचे काय? जागतिक स्पर्धेत आपण पुढे असावे असे वाटण्यात गैर काहीच नाही, पण ज्या देशात मोबाईलपेक्षा शौचालयांची संख्या कमी आहे तेथील सर्वसामान्यांना जगाचे नेतृत्व करण्याची ही आकांक्षा कशी काय समजावणार? श्रीमंत आणि मध्यम-उच्चमध्यम वर्ग वगळता उर्वरित भारताकडे फक्त पैसे कमी आहेत असे नाही तर हा वर्ग वंचित आहे. आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी अशा आवश्यक सुविधा त्यांना पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यांना दारिद्र्यातून बाहेर काढल्याशिवाय भारताला जगाचे नेतृत्व करणे जमेल? हा प्रश्न म्हणजे भारताच्या नेतृत्वगुणांवर घेतलेली शंका नाही किंवा निराशावादही नाही.
प्रश्न तीन गोष्टींचा आहे. एक म्हणजे अंतर्गत परिस्थिती, दुसरी इच्छाशक्ती आणि तिसरी म्हणजे नेतृत्वाची उपलब्धता. अंतर्गत परिस्थिती सुधारल्याशिवाय भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याचे नैतिक धैर्य येणार नाही हे अगदी नक्की. त्यासाठी 'नाही रे' वर्गाचा विकास साधण्यापासून नक्षलवादावर उपाय शोधण्यापर्यंत अनेक आव्हाने भारतासमोर आहेत. विकास म्हणजे टोलेजंग इमारती आणि झगमगत्या मोटारी नव्हेत, तर सर्वांच्या किमान प्राथमिक गरजा सहज पूर्ण व्हाव्यात अशी परिस्थिती निर्माण करणे हाच विकास. दुसरी बाब म्हणजे भारताकडेच जगाचे नेतृत्व करण्याची इच्छाशक्ती आहे का? पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची तशी इच्छा असल्याचे जाणवते, पण एक देश म्हणून भारतीयांची तशी तयारी आहे का हे बघावे लागेल आणि नसेल तर तशी तयारी करुन घ्यावी लागेल. एकीकडे भारतीय नागरिक कामानिमित्त जगभरात संचार करताना दिसतात, तर दुसरीकडे एक देश म्हणून आपण आपल्याच कोषात असल्याचे दिसते. जगाचे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगणाऱ्या देशाला अशी प्रतिमा परवडणारी नाही. तिसरे म्हणजे भारताकडे जागतिक नेतृत्व देतील असे किती नेते आहेत? पंतप्रधान सिंग यांना जगभरातून आदर मिळतो किंवा प्रणव मुखर्जी यांची देशात ट्रबलशुटर म्हणून ख्याती आहे. पण 2014 नंतर हे दोन्ही नेते राजकारणात सक्रिय असणार नाहीत. त्यानंतर काँग्रेस किंवा भाजपसारख्या विरोधी पक्षांकडे अशा प्रकारचे नेतृत्व आहे का याचा विचार करणे भाग आहे. ओबामांनी मोठी स्वप्ने तर दाखविली आहेत, पण स्वप्न आणि सत्यातील दरी ओळखल्याशिवाय ती बुजवताही येणार नाही आणि स्वप्ने सत्यातही उतरणार नाहीत.

Wednesday, September 22, 2010

जबाबदारी आपलीच

अयोध्येचा निकाल दोनच दिवसांत अपेक्षित आहे आणि सरकारी पातळीवर असला तरी वातावरणात तणाव दिसत नाहीय. अगदी त्याच जागेवर मंदिर किवा मशिद बांधली पाहिजे असं वाटणाऱ्यांचा १८ वर्षांपूर्वीचा उन्मादही आता दिसत नाही ही समाधानाचीच बाब आहे. याचा अर्थ आपापसातील द्वेषभाव संपला आहे असे नाही, पण द्वेषाने आपलं काहीच हित साधत नाही, फायदा होतो तो फक्त मुठभर राजकारण्यांना आणि ज्यांचे हितसंबंध अशा भांडणात गुंतलेले असतात त्यांचाच हेही लोकांच्या लक्षात आले आहे. थोडक्यात सांगायचे तर अयोध्या निकालाशी बहुतांशी नागरिकांना काहीच घेणंदेणं नाही, अनेक ठिकाणी तर शांतता राखण्यासाठी दोन्ही समुदायांचे नागरिक स्वतःहून पुढाकार घेत आहेत. म्हणजेच ‘आमच्या मर्जीशिवाय तुम्ही आमचा फायदा करुन घेऊ शकणार नाही’, असा संदेश लोक देत आहेत.
अयोध्या प्रकरणी राजकीय, धार्मिक नेत्यांनी सर्वसामान्य जनतेचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करुन घेतला. हा जसा त्यांचा दोष आहे तसा सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलाही आहे. जर त्यांनी आपल्याला वापरून घेतलं तर आपणही त्याना स्वतःचा वापर करु दिलाच की. १८ वर्षांपूर्वी केलेली चूक नागरिक आता सुधारु शकतात तर अजून एक चूक आपण सुधारू शकतोच, ती म्हणजे भ्रष्टाचाराची. आपल्या सगळ्यांना भ्रष्टाचाराची इतकी सवय लागली आहे की हा एक भयंकर गुन्हा आहे हेच आपल्या ध्यानात राहिलेले नाही. आधी काही हजार, काही लाखांत होणारे घोटाळे आता हजारो कोटी रुपयांचे आकडे घेऊन समोर येतात आणि आपल्याला त्याचे काहीही वाटत नाही. गेल्या दोन वर्षांतच दोन मोठे आर्थिक घोटाळे उघड झाले आणि त्यावर एक समाज म्हणून आपण अतिशय थंड प्रतिक्रिया व्यक्त केली. एक म्हणजे टू जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि दुसरा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या तयारीतील घोटाळा. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने 70 हजार कोटींची सीमा गाठलीय तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये नक्की किती घोटाळा झाला त्याचा अंदाज अजून येत नाहीय. आतापर्यत या स्पर्धेसाठी किमान दीड लाख कोटी रुपये खर्च आला आहे, स्पर्धेच्या तयारीची अवस्था पाहता त्यापैकी किती रक्कम भ्रष्टाचाराच्या खात्यात जमा झाली असेल ते सांगता येत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून आपण भ्रष्टाचार फक्त बघतच नाही तर सहन करत आलो आहोत आणि कळत नकळत त्याचा हिस्साही बनलो आहोत. त्याचा विपरित परिणाम आपल्याच आयुष्यावर झाला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पर्यावरणाच्या समस्या, कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, या आणि इतर अनेक समस्यांच्या मुळाशी आहे तो भ्रष्टाचार. आपण ते इतकी वर्षे का सहन केले ते माहित नाही. पण आता तरी सहन करु नये. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भ्रष्टाचाराचा परिणाम देशाच्या प्रतिमेवरच झालाय. उभ्या जगात देशाचं हसं झालंय. जगातील तिसरी महासत्ता म्हणून आपल्याकडे बघितलं जात असताना एक साधी क्रीडास्पर्धा आपल्याला भरवता येऊ नये? महासत्ता म्हणजे काय फक्त आर्थिक विकासाचा दर, शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि परकीय चलनाची गंगाजळी एवढाच अर्थ होतो का? एखादे भव्यदिव्य काम करता येऊ नये आपल्याला? नक्कीच करता आलं असतं. आपल्याला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे हक्क 2003 मध्येच मिळाले होते. सात वर्ष हा काही कमी कालावधी नाही. तरीही कलमाडी आणि कंपनी आपल्याला नक्की कोणत्या कामात किती पैसे खायचे आहेत याचे नियोजन करीत राहिली, स्पर्धेचे काय होईल, नियोजनात काही त्रुटी राहिल्या तर देशाचे नाव बदनाम होईल, महासत्ता म्हणवू पाहणाऱ्या आपल्या देशाला उभं जग हिणवेल या कशाचीही चिंता त्यांना नव्हती. कारण ते निर्ढावलेले भ्रष्टाचारी आहेत. त्यांना माहित आहे, या देशात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे. जनता आपल्याला जाब विचारणार नाही, पंतप्रधान तर त्याहून नाहीत. (राष्ट्रकुल स्पर्धेत अमेरिका कुठे आहे?) त्यामुळेच या सर्व चांडाळाची हिंमत झाली आपल्या देशाचे नाव बदनाम करण्याची. सर्व जगात आपली मान लाजेने खाली गेली आहे. स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन काही देश स्पर्धेतून नाव काढून घ्यायची भाषा करीत आहेत. संतापजनक आहे हे. पण भ्रष्टाचारात लडबडलेल्या समितीला त्याचे काय? त्यांना फक्त मलिदा खाण्याशी मतलब.
प्रश्न इतके दिवस आपण काय केले हा आहे आणि ‘काहीच नाही’ हे त्याचे उत्तर आहे. आता स्पर्धच्या निमित्ताने तरी आपण जागे होणार आहोत की नाही हा मुद्दा आहे. सुरेश कलमाडी आणि कंपनीला कठोर शासन झालं पाहिजे ही मागणी आपण करणार आहोत की नाही? त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली नाही तर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला चालला पाहिजे आणि त्यांना उरलेलं आयुष्य तुरुंगात काढायला लागलं पाहिजे. तरच आमचे थोडेफार समाधान होईल. यापुढे आम्ही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही हा संदेश जनतेतूनच राजकारणी आणि नोकरशाहीपर्यंत गेला पाहिजे तरच काही उपयोग आहे. अयोध्या प्रकरणी 18 वर्षानंतर का होईना नागरिक संबंधितांना योग्य तो संदेश देत आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही तसा दिला जाईल का? म्हणूनच म्हटलं सगळं काही आपल्याच हाती आहे, जबाबदारी आपलीच आहे.

Thursday, February 4, 2010

थँक्स परेश मोकाशी!!

एखादी जाहिरात तंतोतंत खरी आहे, असं कितीदा घडतं? मी तरी अशी खरीखुरी जाहिरात आतापर्यंत पाहिली नव्हती. काल पाहिली. 'रक्तरंजित सूड, मादक नृत्य, थरारक स्टंट्स आणि भावनिक हलकल्लोळ नसलेला अफाट आणि अचाट चित्रपट!' या जाहिरातीतला प्रत्येक शब्द खरा आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाची ही जाहिरात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे निर्माते दादासाहेब फाळके यांच्यावर बेतलेला हा चित्रपट.
केल्फा या नावाने जादूचे प्रयोग करता करता, फाळके या गृहस्थाच्या नजरेला चित्रपटाची जाहिरात पडली आणि इतिहासाला प्रारंभ झाला. चित्रपट पाहण्याचं वेड लागल्यावर, हे पडद्यावरचं नाटक निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यासाठी किती कष्ट पडले, याची चित्तरकथा आपल्याला हरिश्चंद्राच्या फॅक्टरीत बघायला मिळते. पण या फॅक्टरीचं वैशिष्ट्य हे चित्रपटात कुठेही त्या कष्टांचं भांडवल करण्यात आलेलं नाही. हलती चित्र सादर करण्याच्या वेडापायी फाळकेंना घरातली एकेक वस्तू विकावी लागली. पण हे सगळं फाळके कुटुंबियांनी सहज सहन केलं. त्यामध्ये कुठेही अतिरिक्त त्यागाची भावना दिसत नाही. चाळीत राहणाऱ्या फाळकेंच्या घरात सर्वात प्रथम विकलं जातं ते लाकडी कपाट, पण त्याचं घरच्यांना काही दुःख वाटत नाही. दुःख वाटतं ते शेजाऱ्यांना. खरंतर या ठिकाणी सनईचे रडके सूर काढण्याची पुरेपूर सोय होती. पण दिग्दर्शकानं हे रडके सूर इथेच नाही तर संपूर्ण चित्रपटात कुठेही वापरले नाहीत. अगदी एकदा शुटिंग करताना फाळकेंचा मुलगा जखमी होतो, तिथेही नाही. पण मुलाला कवटाळणाऱ्या फाळकेंमधला बाप मात्र तिथे दिसतो.
सरळ मार्गाने उत्तुंग ध्येय गाठताना पराकोटीचे कष्ट, अनंत अडचणी यांचा सामना करावाच लागणार, त्याला पर्यायच नाही. पण या अडचणींवर लक्ष केंद्रीत करायचे की प्रत्यक्ष ध्येय गाठल्याच्या आनंदावर, यातला दुसरा पर्याय दिग्दर्शकानं निवडलाय. मला तरी ही बाब खूप महत्त्वाची वाटते. हा चित्रपट पाहताना फाळकेंना किती अडचणी आल्या याची जाणीव होते. पैसे जमवण्यापासून ते चित्रपटासाठी स्त्री पात्र मिळवण्यापर्यंत. चांगल्या घरातल्या स्त्रिया सोडाच, पण अगदी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियासुद्धा चित्रपटात काम करणे वाईट दर्जाचे समजत होत्या. शेवटी एका पुरुषालाच तारामतीची भूमिका साकारावी लागली. या ना त्या, अनेक अडचणी. त्या प्रत्येक अडचणीवर मात करत फाळकेंनी त्यांचं ध्येय गाठलं. त्यांना आलेली प्रत्येक अडचण, त्यांच्या कष्टाला कमीपणा न आणता, अगदी हलक्याफुलक्या पद्धतीनं समोर येते.
फाळकेंनी पहिला चित्रपट हरिश्चंद्रावर काढला, ही बाब अगदी पहिल्या प्रसंगापासून आपल्यावर ठसत जाते. त्यामुळेही अगदी पहिल्यापासून आपण त्यात समरस होऊन जातो. या घटनेचा कालावधी टिळकांच्या बरोबरचा आहे. म्हणजे लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना फाळके चित्रपटाच्या जुळवाजुळवीत गुंतलेले असतात. कधीतरी त्यांच्यासमोरुन स्वराज्याचे नारे देणारे तरुण जातात, पोलिस त्यांना उचलून नेतात. फाळके त्यामध्ये सहभागी होत नाहीत. पण म्हणून ते देशप्रेमी नव्हते असे कोण म्हणेल? परदेशात चित्रपट निर्मितीसाठी सर्व मदत मिळत असताना, फाळकेंनी ती नाकारली. मला इथे नाही तर माझ्या देशात चित्रपटनिर्मिती करायची आहे. नाहीतर तिथे चित्रपटांचा उद्योग कसा बहरेल अशी विचारणा ते करतात. स्वातंत्र्यपूर्व काळातही देशाच्या उभारणीत फाळकेंचं केवढं मोठं योगदान होतं, याची दखल आतापर्यंत फारशी कोणी घेतलेली नाही.
आज वर्षाला जवळपास नऊशे चित्रपट निर्माण करणारी आपली भारतीय चित्रपटसृष्टी. हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहताना, धुंडिराज गोविंद फाळके या वल्लीचे आपल्यावर केवढे मोठे ऋण आहेत याची प्रखर जाणीव आपल्याला होते. ती करुन दिल्याबद्दल दिग्दर्शक परेश मोकाशींना लाखलाख धन्यवाद!